जुनी अडगळ आवरायला काढली की, बरेच शोध लागतात असा आपल्या सर्वांचाच अनुभव आहे. परवा हाच उद्योग करीत बसलो असताना मुलांची बालक मंदिरात असतानाची पुस् तके हाताला लागली.वाचायला मोठी गंमत वाटली. "गुलाबी मनोरा लावतो, दट्टयापेटी लावतो, भाजी निवडतो, पीठ चाळतो......' अशा स्वरूपाचा मजकुर वाचताना हाताचा वापर करायची कौशल्ये कशी वाढत गेली,विचारशक्ती, तर्कशास्त्र यांना कशी चालना मिळत गेली याचा चित्रपटच डोळ्यांसमोर उभा राहिला. अणि नंतर अचानक लक्षात आले, की प्राथमिक शाळेत दाखल झाल्याबरोबर ती तपशीलवार माहिती देणारे प्रगतिपुस्तक अदृश्य झाले आणि त्याऐवजी केवळ मार्कांचे आकडे मांडलेले दोन पानी कार्ड, प्रगतिपुस्तक म्हणून मिळायला लागले.
त्या वेळी या बदलाचे काही विशेष वाटले नव्हते; पण आज वीस वर्षांनंतर असे वाटते की, असे आणखी काही वर्षापर्यंत, निदान प्राथमिक शाळेत असेपर्यंत केले असते तर बरे झाले असते.असे वाटण्यामागे एक कारण आहे.ते असे की, हे वर्णन वाचताना त्यामध्ये कोठेही त्याला किती गुण मिळाले याचा अजिबात उल्लेख नाही.अर्थात या वेळी असे गुण दिलेही जात नसतात हे तर खरेच; पण त्यापेक्षाही त्यामधे अंगभूत कौशल्यांचे मूल्यमापन, निदान निरीक्षण होत असते ही गोष्ट मला फार महत्वाची वाटते. आणि आता लक्षात येत आहे की, नंतर च्या संपूर्ण शालेय जीवनात विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे मोजमाप, मूल्यमापन निदान निरीक्षण करण्याची कोणतीही यंत्रणा अस्तित्वातच नाही.साचेबंद परीक्षा आणि त्यामधे मिळणारे गुण हे कोणाही विद्यार्थ्याचे योग्य मूल्यमापन म्हणताच येणार नाही. कारण ते स्मरणशक्तीचेच प्रतीक असते.
- माधव खरे....................
"डिसेलेक्सिया' शिक्षणसंस्थांचा नवा आजार....!काही दिवसांपूर्वी "तारें जमीन पर' हा "डिसेलेक्सिया' हा आजार असलेल्या मुलावर बेतलेला चित्रपट आला होता. चित्रपटासारखीच त्याची कॅचलाइनही खूप छान होती. "एव्हरी चाइल्ड इज स्पेशल'! खरंच प्रत्येक मुलाकडे विशेष अशी एक क्षमता असते. प्रत्येक मूल हे खास असतं पण त्या मुलावर लादलेल्या दप्तराच्या आणि आपल्या अपेक्षांच्या ओझ्यात आपण त्याच्या वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष करतो. आपल्यासमोर असतं ते फक्त आकड्यांनी भरलेलं प्रगती पुस्तक. आणि त्यातले आकडेही पालकांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे हवे असतात. त्यामुळे मुलांना आपण केवळ परीक्षार्थी बनवतो.
हा दृष्टिकोन फक्त पालकांचाच नाही तर शाळांचाही आहे. त्यामुळेच शाळांमध्ये केवळ अभ्यासाच्या विषयांनाच महत्त्व दिले जाते (खरं तर प्रत्येक विषय हा अभ्यासाचाच असतो.आ णि ग्रेड मिळविण्यापुरतेच असलेले संगीत, शारीरिक शिक्षण, शिवण यांसारखे विषय प्रगतीपुस्तकाच्या कोपऱ्यात राहतात. मग एखादा चांगला गात असेल, एखाद्याच्या बोटातून सुरेख चित्रं साकारत असतील किंवा कोणी मैदान गाजवत असले तरी या सगळ्या गोष्टी अभ्यास संभाळून करायच्या गोष्टी! ही देखील कला असते, बुद्धिमत्ता असते आणि ती जाणीवपूर्वक विकसित करायची असते याकडे दुर्लक्ष होते.
अनेक संस्था, शाळा आता या संबंधी विचार करत आहेत. केवळ परीक्षार्थी घडविण्यासाठी प्रयत्न न करता जिज्ञासा, कुतूहल असलेले "विद्यार्थी' कसे घडतील, मुलांचा भावनिक बुद् ध्यांक कसा वाढेल यासाठी वेगवेगळे प्रयोग करत आहेत. मात्र आपल्या बंदिस्त आणि रिजिड शिक्षणपद्धतीत असे प्रयोग हे केवळ अपवाद बनून राहत आहेत. हे अपवाद "नेहमीच' व्हावेत यासाठी शिक्षणसंस्था, शिक्षक पालक सर्वांनीच आपल्या "मार्क्सवादी' विचारातून बाहेर पडून प्रयत्न करणे आवश्यक आहे.
..................
आपणही कधीतरी जुनी अडगळ आवरायला काढत असाल ना? आपल्या हाती असं कधी काही लागलंय, की ज्यातून घडत गेलेले बदल सहज म्हणून जाणवले. अडगळंच नाही, तर सहज म्हणूनही नवे बदल लक्षात येत असतील. नक्की कोणते बदल टिपलेय हो आपण? या बदलांनी तुम्ही कधी व्यथित झाला आहात का? की, बदल हेच प्रगतीचे मानकरी मानलेत. मला वाटतं, बदल हा हवाच. पण, तो चांगल्याकडून वाईटाकडे नको. तर, नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाणारा हवा. तरच, त्या बदलाला अर्थ आहे. नाही का?