व्यासपीठ पुणेकरांचे

हा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे "शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची!

संडे स्पेशल

अवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे "ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.

<>

भरदिवसा डॉक्‍टरचा निर्घृण खून

प्रभात रस्त्यावरील घटना ः कारण अद्याप उघड नाही

प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. विजय रामचंद्र घैसास (वय 67) यांचा बंगल्यात घुसून आज निर्घृण खून करण्यात आला. सकाळी सव्वा नऊच्या सुमारास प्रभात रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील रहिवासी हादरून गेले आहेत. लेखिका वासंती घैसास यांचे ते पती होत. खुनाचे कारण अद्याप उघड झालेले नाही, असे उपायुक्त सी. एच. वाकडे यांनी सांगितले. मात्र, विविध शक्‍यता गृहीत धरून तपास सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ते बंगल्यात एकटे असताना तीन हल्लेखोर आले. त्यांनी त्यांच्या पोटावर, मानेवर असे एकूण सहा वार केले. ही घटना घडत असतानाच त्यांच्याकडे साफसफाईचे काम करणाऱ्या विठाबाई बाळू घोटाळ (वय 45, रा. एसएनडीटी जवळ, कर्वे रस्ता) या घरात आल्या. दोन हल्लेखोरांनी त्यांचे तोंड दाबून त्यांना स्वच्छतागृहात ढकलले व पळ काढला.

सर्वाधिक शांत व "क्रीम एरिया' समजल्या जाणाऱ्या प्रभात रस्ता-एरंडवणे भागात आज निर्घृण पद्धतीने, तेही एका डॉक्‍टरचा झालेला खून रहिवाशांसाठी धक्कादायक ठरला.डेक्कन जिमखाना, प्रभात रस्ता, एरंडवणे या भागातील जुने बंगले 1960च्या दशकाची साक्ष अजूनही मिरवितात. शहरात कोठेही कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडली, तरी या भागात त्याची प्रतिक्रिया उमटलेली नाही. नियमांचे पालन करण्यावर भर असलेले येथील रहिवासी कमालीचे जागरूक आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून येथील बंगल्यांच्या आवारात असलेल्या चंदनाच्या झाडांवर चोरट्यांचा डोळा आहे.

सुमारे तीस वर्षांपूर्वी झालेल्या या भागातील जोशी-अभ्यंकर हत्याकांडाचाही संदर्भ येत होता. तसेच आठ-नऊ वर्षांपूर्वी या भागात मित्राशी गप्पा मारत बसलेल्या एका युवतीला पळवून नेऊन पुणे विद्यापीठाच्या आवारात तिच्यावर बलात्कार झाला होता. पुण्यामध्ये एनआरआय वृद्धांचे प्रमाणही मोठे आहे. त्याचबरोबर मुले नोकरीनिमित्त विदेशात स्थायिक झालेल्या मातापित्यांचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत वृद्धांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे....या खुनाने वृद्धांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

3 comments:

  1. Anonymous said...
     

    डॉ. विजय घैसास यांचा खून जमिनीसाठी झाला असावा असे वाटते. मुलं परदेशी असल्यामुळे प्रभात रस्ता-भांडारकर रस्ता भागात असे अनेक आईवडील एकटे राहात असावेत. अशा बंगल्यांवर, जमिनींवर जमीन बळकावणाऱ्या माफियाची नजर असावी. काही वर्षांपूर्वी रोहिणी भाटे यांना त्यांच्या नृत्यशाळेची जागा रिकामी करण्यासाठी एका बड्या मंत्र्याच्या गुंडांनी धमकी दिली होती. त्याची आठवण झाल्यावाचून राहिले नाही.

  2. Unknown said...
     

    महाराष्ट्राबाहेर असताना डॉ.विजय घैसास यांच्या निर्घृण खूनाची बातमी इ-सकाळ्वर वाचून अतिशय दुखः तर झालेच,पण एके काळचे पेन्शनरांचे व विद्येचे माहेरघर अशी ख्याती असलेले शांत व सुंदर पुणे राज्यकर्त्यांच्या विकासाच्या व्याख्येमुळे व जागतिकीकरणाच्या भराड्यात सापडल्यामुळे किती जलदगतीने विनाशाकडे चालले आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली.
    २]अशा तर्हेच्या बातम्या पुण्यात व इतरत्र नियमितपणे येत असतात तरी यावर उपाय कांहिहि नाही व अशी निर्घुण अमानुष कृत्ये करणा-यांना पकडले गेले तरी शिक्षेविना जामिनावर सोडून देणे याचा मनापासून राग येतो.
    ३]गुन्हेगारांच्या केस लढवून त्यांना सोडविणारे काळे कोटवाले वकील,केस कोर्टात दाखल झाल्यावर झटपट निर्णय न घेता क्षुल्लक कारणांवर तारखांवर तारखा देणारे न्यायाधीश,जनतेच्या मनस्थितीची कदर न करता परिस्थिती आणखी चिघळू देणारे राज्यकर्ते,समाजात असे कित्येक चोर दरोडेखोर,लुटारू व समाजकंटक राजरोसपणे फ़िरत आहेत हे माहिती असूनहि संख्याबळ अपुरे या सबबीखाली अर्धवट तपास करणारे पोलिसखाते,ज्या कांही थोड्याफ़ार खूनी किंवा बलत्कारी किंवा जबरी चो-या करणा-या व्यक्तींना अटक केलीच तर पुरावा अपूरा म्हणून त्यांना फ़क्त १५-२० दिवसांची पोलिसकस्टडी व नंतर सुटका या भारत देशातल्या ढिसाळ न्यायव्यवस्थेच्या लाजिरवाण्या गोष्टी आहेत.
    ४]आपल्या राज्यकर्त्याना हे सर्व फ़ावल्यावर पडते.पुण्यात अशा व कै.ज्योतीकुमारीच्या खूनाच्या घटना राजरोसपणे घटत असतांना पुणेकरांनी निवडून दिलेला खासदार दिल्लीला मुग गिळून बसतो,तसेच पुण्याचा पालकमंत्री म्हणून मिरवणारी प्रसिद्धीझोतात मिरवणारी व्यक्ती गायब होते!
    ५]पण कुठेहि संगमरवरी किंवा ग्रानाइट कोनशीलांवर स्वतःची नांवे अजरामर करायची संधी मिळाली की उदघाटनाला आवर्जून हजर रहाणारे हे महाभाग निवडणुका जवळ आल्या की मतपेट्यांद्वारा जनतेचा कौल मागायला निर्लज्जपणे पुढे येतात!
    ६]एरवी यांचे चेहरे या ना त्या कारणामुळे फ़लकांवर नियमितपणे बघण्याचे दुर्भाग्य असलेल्या पुणेकरांना मनात प्रश्न आलाच असेल की पुण्याच्या खासदाराच्या घरापासून फ़क्त अर्ध्या किलोमिटर अंतरावर रहाणा-या कै.डॉ.विजय घैसास यांच्यावर ही पाळी आली???
    खासदार पुण्यात असो किंवा नसो,त्याच्या घरासमोर सतत पोलिसपहारा असतो,पण "आम आदमी"ची कुणालाच कदर नसते!
    ७]थोडे दिवस प्रकरण शांत होइपर्यंत पोलिस अधिका
    -यांच्या व त्यांच्या कुत्र्यांच्या झुंडी "त्या" गल्लीत येत रहातील,पण निष्पन्न बहुतेक कांहीच होणार नाही!
    कै.डॉ.विजय घैसास यांच्या आत्म्यास शांती लाभो व त्यांच्या जवळच्या आप्तेष्टांस परिस्थिती धैर्याने हाताळण्याची शक्ती मिळो ही प्रार्थना करतो!
    ८]पुणेकरांनी यातून धडा शिकून नालायकांना योग्य वेळी योग्य धडे शिकवावे अशी अपेक्षा करू शकतो का आपण?

  3. Unknown said...
     

    तीन खुनींपैकी दोन पकडले हे समजून थोडेफ़ार समाधान वाटले तरी निरपराध डॉ.घैसास कायमचे अनंतात विलिन झाले.
    गुन्हा कबूल केलेल्या खुन्यांना पोलिस कस्टडी,त्यानंतर केस दाखल, आरोपींची जामिनावर मुक्तता व नंतर वर्षनवर्षे कोर्टकचे-या हे नेहेमीचे वेळकाढू नाटक टाळण्याकरता यांना ताबडतोब तितक्याच अमानुषपणे हालहाल करून सुळावर चढवले तरच भावी गुन्ह्यांना आळा बसेल.

    सौदी अरेबियासारख्या पर्शियन गल्फ़मधील देशांचे व चायनाचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवून शिक्षा दिली नाही तर असे गुन्हे अविरत चालूच रहातील.

    आपल्याकडे फ़ाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने पक्की करूनहि तिची अंमलबजावणी कधीच होत नाही,मग अशा अपराध्यांना व अशी कृत्ये नियोजन करणा-यांना जरब कधीच बसत नाही!
    बिल्ला रंगानंतर कुणाला फ़ाशी दिल्याचे ऐकिवात नाही!

    कसली ती आपली कोर्टे,कसली ती आपली कालबाह्य न्यायप्रक्रिया,कसली ती राजकारण्यांची सगळीकडे लुडबुड किंवा ढवळाढवळ करण्याची वृत्ती!

    आपले केंद्रीय गृहमंत्री सगळीकडे हाय कमांडच्या बरोबर मिरवणार,तसेच सरकारी खर्चाने बंगळूरच्या सत्यसाईबाबांपासून इतर बाबांना नियमित कालावधीने भेटी देणार व जयपूरच्या स्फ़ोटांपासून इतर दहशतवादी घटनांबद्दल मात्र crocodile tears ढाळणार अशा बुळचट व घाबरट धोरणामुळेच सर्व गुन्हेगारांचे मनोबळ व धैर्य उंचावले आहे!

    Human rights वाल्यांच्या ओरडीकडे दुर्लक्ष करणे तर अगदी जरूरीचे आहे.४० वेळा भोसकून खून करणारे,असहाय अबलांवर बलात्कार करणारे अशा गुन्हेगारांच्याबद्दल यांना कैवार वा पुळका येतो!
    An eye for an eye and a tooth for a tooth या रणनितीतले उत्तरच या गुन्हेगारांना/दहशतवाद्यांना कळते!

    पुण्याच्या पोलिस कमिशनरांचे खुनी पकडल्याबद्दल अभिनंदन करतांना त्यांनी पोलिस कायद्यात व पिनल भारतीय कोडमध्ये सुधारणा सुचवाव्या व हे अशक्य असेल तर अपराधींचा एन्कौंटरमध्ये कायमचा नायनाट करावा अशी अपेक्षा करू शकतो का आपण???

Post a Comment