सर्वाधिक फटका जैववैविध्याला
नाईक एन्व्हायरन्मेन्टल रिसर्च इन्स्टिट्यूट लिमिटेडने केलेल्या पाहणीतील ही माहिती आहे. संस्थेने या दोन नद्यांसह पवना नदीच्या प्रदूषणाची पाहणी गेल्या तीन वर्षांपासून करण्यात येत आहेत. यात नदीपरिसरातील जैववैविध्याबाबत प्राणिशास्त्र व पर्यावरणशास्त्राचे अभ्यासक करत आहेत. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, 1954-55 मध्ये नदीपात्र परिसरात विविध प्रकारच्या चारशे वनस्पतींची नोंद झाली होती.
दहा वर्षांपूर्वी ही संख्या दीडशेपर्यत खाली आली होती. नदीतील प्रदूषणाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे आता ही संख्या शंभरपेक्षाही कमी झाली आहे. नदीत 110 प्रकारच्या विविध प्रकारच्या माशांची नोंद झाली होती. 1995 मध्ये ही संख्या 83 झाली होती. 2002पर्यंत यातील 18 जाती नष्ट झाल्या होत्या. गेल्या काही वर्षांत त्याही झपाट्याने कमी झाल्या आहेत. सध्या नदीच्या पाण्यात ऑक्सिजन नसल्याने माशांचे जगणे अत्यंत मुश्किल झाले आहे. त्यामुळे जे मासे आहेत, तेही आता नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.
हीच स्थिती पक्ष्यांची आहे. 1983मध्ये झालेल्या पाहणीत 45 पक्ष्यांची नोंद झाली होती. नंतर पंधरा वर्षांच्या कालावधीत ही संख्या 16 पर्यंत कमी झाली आहे. नदीसौंदर्य व पूर्वीप्रमाणेच जैववैविध्य निर्माण करण्यासाठी संस्थेने महापालिकेने सोपविलेला प्रकल्प हाती घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
नदीतून बाहेर पडतोय मिथेन वायू
संगम पुलाजवळ नदीत सर्वत्र कचरा, गाळ दिसून येतो. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण तेथे नाहीसे झाल्याने तेथून आता मिथेन हा घातक वायू बाहेर पडू लागला आहे. पाण्यातून बुडबुडे येत असल्याचे तेथे दिसते. तासभर तेथे थांबल्यास दुर्गंधी व या वायूमुळे गुदमरायला होऊन अस्वस्थ वाटू लागते, असे निरीक्षण राहुल मराठे यांनी नोंदविले.