पोलिसांना लवकरच अधिक स्वायत्तता
""पोलिसांना अधिक स्वायत्तता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, लवकरच राज्य सुरक्षा परिषद (स्टेट सिक्युरिटी कौन्सिल) स्थापन करण्यात येईल,'' अशी माहिती उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी नुकताच एका कार्यक्रमात दिली.
""सचिवालयात बसणाऱ्यांचे अधिकार कमी झाले तरी चालतील, परंतु, पोलिस दलाला स्वायत्तता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या पंधरा दिवसांमध्ये या सुधारणांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात येणार आहे. राज्य सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात येणार असून त्यानुसार राज्य आणि जिल्हा स्तरावर समित्यांची नियुक्ती करण्यात येईल. पोलिस महासंचालक, महानिरीक्षक या पदांचा कालावधी निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिसांना अधिक चांगली सेवा देणे शक्य होईल.'', असेही त्यांनी या वेळी सांगितले.
ते म्हणाले, ""पोलिसांचा संबंध नसलेली अनेक कामे त्यांना करावी लागतात. ती कामे कमी करण्याचा प्रयत्न आहे, मात्र, त्यात अनेक मर्यादा येत आहेत. बालमजुरी, दूध भेसळ, हातभट्ट्या पोलिसांच्या मदतीनेच रोखण्यात आल्या आहेत. अनावश्यक कामे टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येतील. गुन्ह्यांचा तपास हे पोलिसांचे खरे काम आहे, परंतु, सध्या नसते वाद वाढत आहेत त्यामुळे पोलिसांची शक्ती कायदा आणि सुव्यवस्था राखण्यातच खर्ची पडत आहे.'' .
व्हीआयपींना देण्यात येणाऱ्या संरक्षणाबाबत त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, राज्यातील "व्हीआयपीं'च्या संरक्षणासाठी पोलिस दलाचे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात अडकून पडते, याचा उल्लेख करून पाटील म्हणाले, ""या "व्हीआयपीं'पैकी अनेक जण असे आहेत, की पैसे देऊन मारा, म्हटले तरी कोणी त्यांना मारणार नाही.'' महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात फक्त "व्हीआयपी'च महत्त्वाचे आहेत का, सामान्य माणसांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची नाही का, असा प्रश्न विचारून त्यांनी असे अनावश्यक संरक्षण टप्प्याटप्प्याने दूर करण्याचे आश्वासन दिले.